Monday, December 1, 2014

कोल्हापूर.... कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम


गल्लीत एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत. अजूनही खादीचे कपडे वापरून आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करतात. गल्लीत एक वायुसेनेतील निवृत्त अधिकारीही आहेत... वास्तविक गल्लीतल्या गणेशोत्सवात या दोघांना आरतीचा मान देणे आपले कर्तव्यच आहे; पण तसे नाही, गणेशोत्सवाच्या आरतीचे नियमच ठरले आहेत. ज्याने वर्गणीसाठी पाच हजार रुपयांची पावती फाडली, त्यालाच आरतीचा मान आहे आणि अर्थातच हा मान एक जुगारअड्डा चालक, एक मटकेवाला, एक खासगी सावकार, एक जागेचा दलाल यांना मिळाला आहे. कारण प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये वर्गणी देण्याची ऐपत फक्त त्यांच्यातच आहे. गणेशोत्सवाची आरती हे केवळ एक उदाहरण आहे; पण कोल्हापुरातील बहुतेक सार्वजनिक मंडळे, तालमींना सध्या या दोन नंबरवाल्यांच्या पैशाची ताकद मिळाली आहे आणि अशी आर्थिक ताकद वापरून त्यांनी इथल्या सार्वजनिक क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पाचगावच्या घटनेनंतर सीपीआर परिसरात झालेल्या गर्दीवर एक नजर टाकली तर त्यात पाचगावचे अशोक पाटीलप्रेमी ग्रामस्थ जरूर होते; पण ते सोडून अनेक जण मर्डर, हाफ मर्डर, दंगल, दहशत, मटका, सावकारी क्षेत्रातले होते. ते तेथे का आले होते, हे महत्त्वाचे आहे आणि पोलिसांच्या कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरणही झाले आहे. या लोकांनी आपले समर्थक गावागावांत, मंडळामंडळांत, तालमीतालमींत कसे पेरले आहेत, हेच त्यातून स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानाची भाषा वारंवार वापरणाऱ्या कोल्हापुरातले हे चित्र निश्चितच गंभीर आहे. पुढची महापालिका, विधानसभा निवडणूक कोणत्या पातळीवर जाऊन पोचलेली असेल, त्याची एक झलकच त्यातून दिसून गेली आहे. कोल्हापुरात मान कार्यकर्त्याला की गुंडाला, याचा एकदा सर्व पातळीवर विचार करण्याची गरज त्यातून अधिक गडद झाली आहे. कोल्हापूर ही कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम मानली जाते. तशी परिस्थितीही आहे; पण कार्यकर्त्यांपेक्षा वरचढ ठरलेल्या काळेधंदेवाल्यांनी कळत नकळत सार्वजनिक कार्यक्रमांचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. गणपतीची आरती मटकेवाला, महाप्रसाद वाटप दारूवाला, मोहरमचा नारळ फोडायला खासगी सावकार, नवरात्राची पूजा करायला जुगारवाला हे काही मंडळांचे निकषच ठरले आहेत. ते हजाराच्या पटीत वर्गणी देतात म्हणून त्यांना हा मान द्यायचा, हे जणू ठरूनच गेले आहे. हे चित्र भविष्यात अधिक विदारक होणार आहे. हजार, दहा हजारांत एखादे मंडळ "गळाला' लागणार असेल, तर ही काळेधंदेवाली मंडळी आपल्या थैल्या उघडून बसणारच आहेत आणि मंडळ, तालीम बाजूला राहू दे; आपला कोल्हापूरचा स्वाभिमानच ते या काळ्या पैशाच्या बळावर भुसभुशीत करणार आहेत. पाचगावच्या घटनेनंतर "सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा वैरी' असे फलक त्यामुळेच लागले आहेत. पाचगावची घटना एखाद्याचा निर्घृण खून झाला म्हणून निश्चित वाईट आहे; पण कोल्हापूरच्या काही मंडळांवर, काही तालमींना काळ्या पैशाचे कसे वरदान होते, यावर प्रकाशझोत टाकून गेली आहे.

No comments:

Post a Comment